देश

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न’

भारतीय विचार साधना (भाविसा), पुणे यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नाना थिटे सभागृहात उत्साहात आणि मोठ्या उपस्थितीत पार पडला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री गिरीश प्रभुणे, लेखक अरुण करमरकर, ‘भाविसा’चे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे, कार्यवाह काशिनाथ देवधर, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकाचे लेखन दिलीप क्षीरसागर, अरुण करमरकर आणि दिलीप करंबळेकर यांनी केले असून, संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचे विशेष महत्त्व अधोरेखित करण्यात आले.प्रमुख वक्ते सुनील आंबेकर यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागील विचार स्पष्ट करताना सांगितले की, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी समाजातील दोष दूर करून दीर्घकालीन परिवर्तन घडवण्यासाठी संघाची स्थापना केली. त्यांनी व्यक्ती निर्माण आणि त्या व्यक्तींचे संघटन या दोन घटकांवर विशेष भर दिला. समाजपरिवर्तन ही एक नैसर्गिक आणि सतत चालणारी प्रक्रिया असून, ती सर्वसामान्यांच्या सहभागातून घडते, असेही त्यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले की, संघ समजून घेण्यासाठी मोठ्या वैचारिक मांडणीपेक्षा स्वयंसेवकांचे दैनंदिन आचरण अधिक महत्त्वाचे आहे. संघाचे कार्य हे केवळ विचार मांडण्यापुरते मर्यादित नसून ते कृतीतून प्रकट होते, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी आपल्या मनोगतात भारतातील विस्कळीत झालेल्या समाजव्यवस्थेला एकत्र आणण्याचे कार्य संघाने केले असल्याचे सांगितले. विविध क्षेत्रांतील वैचारिक गोंधळ कमी करण्यासाठी संघाचे योगदान महत्त्वाचे ठरले असून, हिंदुत्व हा सर्वांना जोडणारा विचार असल्याची जाणीव आज समाजाला होत असल्याचे त्यांनी नमूद केले. संघ हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून व्यापक सामाजिक एकात्मतेचा विचार मांडणारा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.लेखक अरुण करमरकर यांनी ‘स्वयंसेवक’ या संकल्पनेवर भाष्य करताना सांगितले की, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या तीन शब्दांची मीमांसा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘स्वयंसेवक’ या शब्दाचा अर्थ आणि त्यामागील मूल्ये समजून घेण्याचा आपला अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. गिरीश आफळे यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला, तर काशिनाथ देवधर यांनी आभार प्रदर्शन केले.या प्रसंगी सुनील आंबेकर यांनी ‘धर्म’ आणि ‘रिलिजन’ या संकल्पनांमधील फरक अधोरेखित करताना सांगितले की, भारतीय परंपरेत ‘धर्म’ ही संकल्पना कर्तव्य, मूल्ये आणि समाजकल्याणाशी संबंधित आहे. पाश्चात्त्य ‘रिलिजन’ संकल्पनेशी तुलना केल्यामुळे या विचाराचा गैरसमज झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यकारभार, शिक्षण आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये मूल्याधिष्ठित दृष्टिकोनाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.