Sankalp Hindu Times

देश

देश

नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघड; तरुणीवर अत्याचार व धर्मांतरासाठी दबाव, आरोपी अटकेत

नाशिक : पंचवटी परिसरात एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाने शहर हादरले आहे. जबरदस्तीने फोटो काढून त्यांचा गैरवापर करत पीडितेला ब्लॅकमेल करण्यात आले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.तक्रारीनुसार, आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीला विविध ठिकाणी नेले. तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला मानसिक दबावाखाली ठेवले. या दबावाचा वापर करून दीर्घकाळ तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे सांगितले जाते.विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यात आरोपीने तिला एका लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने मद्यपान करायला लावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती पुढे आली आहे. याचबरोबर तिच्यावर धर्मांतरासाठीही दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.पीडितेने अखेर धैर्य दाखवत पंचवटी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कठोर कारवाईची मागणी होत आहे.

देश

धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कडक निर्देश

धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कडक निर्देशमुंबई : राज्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्यासाठी पोलिसांना ठोस निर्देश दिले आहेत. महिलांची सुरक्षा आणि गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपास अधिक प्रभावी व निष्पक्ष करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.गेल्या काही दिवसांत नाशिकमधील धर्मांतर प्रकरण, परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरण, खरात प्रकरण तसेच मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.” नाशिकमधील प्रकरण स्वतःहून उघडकीस आणल्याबद्दल त्यांनी स्थानिक पोलिसांचे कौतुक केले, मात्र पुढील तपास अधिक सखोल आणि दमदार करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणातील प्रत्येक बाब, त्यामागील पद्धती आणि संभाव्य जाळ्याचा तपास करण्यात यावा, कोणताही मुद्दा दुर्लक्षित राहू नये, असे त्यांनी अधोरेखित केले.तसेच परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाबाबत बोलताना, पीडितांना पुढे येऊन तक्रार देण्यासाठी विश्वास निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी समुपदेशनाची मदत घेण्याचे तसेच समाजसेवकांचा सहभाग वाढवून पीडितांना आधार देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.एकूणच, राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहून कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

देश

संघ मातीतला, म्हणून रुजला; मार्क्सवाद कालबाह्य झाल्याने संपला’ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर; ‘मला उमगलेला संघ’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, दिनांक १८ एप्रिल २०२६: “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा या मातीतील असून तो उपजत आहे. या उलट मार्क्सवादी विचार हा आयात केलेला आहे. म्हणूनच कालबाह्य झालेला मार्क्सवाद आज संपला असून, संघाचा विचार मात्र जनमानसात खोलवर रुजला आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले. टिळक रस्त्यावरील लेडी रमाबाई सभागृहात आयोजित ‘मला उमगलेला संघ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संगीतकार राहुल रानडे, प्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश जोशी, पुस्तकाचे संपादक सुधीर जोगळेकर आणि ‘भारतीय विचार साधना’ (भाविसा) संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार यांनी तोरसेकर यांच्याशी संवाद साधला. संघाने १०० वर्षे पूर्ण केली असताना कम्युनिस्ट चळवळ का लयाला गेली, याचा उलगडा करताना तोरसेकर म्हणाले, “कम्युनिस्टांना आता भारताची मातीही मान्य नाही. सुरुवातीच्या काळात काही नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र आता ही संपूर्ण चळवळ केवळ ‘पुस्तकी’ राहिली आहे. या उलट संघ स्वयंसेवक समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे. संघ केवळ ज्ञानी लोक घडवत नाही, तर समाजासाठी उपयुक्त ठरणारे लोकसंग्राहक स्वयंसेवक निर्माण करतो.” ऋषिकेश जोशी म्हणाले, “नाट्यकलेचा अभ्यास करताना २० वर्षे मी डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली होतो. मात्र, जगभरातील संस्कृती नष्ट होत असताना भारताची संस्कृती का टिकली, याचा अभ्यास केल्यावर संघ कार्यामागील बलस्थाने लक्षात आली. राष्ट्रभक्तीचा समान धागा मला संघाकडे आकर्षित करणारा ठरला.” राहुल रानडे, “संघाच्या शिस्तप्रियतेमुळेच ही संघटना १०० वर्षे टिकली आहे. संघ प्रार्थनेचे लंडनच्या ‘रॉयल ऑर्केस्ट्रा’मध्ये ५७ वादकांसह ध्वनिमुद्रण करणे, हा एक प्रकारे ‘काव्यगत न्याय’ आहे.” अ‍ॅड. क्षितीज गायकवाड: “बौद्ध समाजात जन्म झाल्यामुळे सुरुवातीला संघाविषयी मनात चुकीची मते होती, मात्र गिरीश प्रभुणे यांच्या सानिध्यात आल्यावर खरा संघ उमजला.” ‘भारतीय विचार साधना’ संस्थेने आतापर्यंत ६०० पुस्तकांचे प्रकाशन केले असून, समाजातील मान्यवरांची संघाविषयीची मते संकलित करण्याच्या उद्देशातून ‘मला उमगलेला संघ’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आल्याचे संपादक सुधीर जोगळेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश आफळे यांनी केले, सूत्रसंचालन दीपक जेवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण कात्रे यांनी मानले.

देश

समृद्ध भारत आणि मी : व्याख्यान उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न

पुणे : नागरिक सोशल फाउंडेशन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले “समृद्ध भारत आणि मी” या विषयावरील व्याख्यान रविवारी मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. फर्ग्युसन महाविद्यालय, शिवाजीनगर येथील अॅम्फीथिएटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, तरुण वर्ग, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रख्यात अर्थकारण व समाजकारण अभ्यासक श्री. दीपक करंजीकर उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रभावी आणि ओघवत्या शैलीत ‘समृद्ध भारत’ या संकल्पनेचा सर्वांगीण वेध घेतला. भारताची आर्थिक प्रगती, जागतिक स्तरावर वाढत असलेली भूमिका, तसेच भविष्यातील संधी आणि आव्हाने यांचा त्यांनी सखोल ऊहापोह केला. आपल्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, समृद्ध भारत घडवण्यासाठी केवळ शासनाच्या योजना पुरेशा नाहीत, तर प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे योगदान देणे अत्यावश्यक आहे. शिक्षण, कौशल्यविकास, उद्योजकता, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकी या घटकांवर त्यांनी विशेष भर दिला. तरुणांनी केवळ नोकरीकडे न पाहता रोजगारनिर्मितीकडे वळावे, नवीन संधी शोधाव्यात आणि देशाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, भारताची समृद्धी ही केवळ आर्थिक बाबींवर अवलंबून नसून, सांस्कृतिक मूल्ये, नैतिकता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक एकता या घटकांवरही तितकीच अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले. डिजिटल युगात भारत वेगाने प्रगती करत असताना, त्या प्रगतीला योग्य दिशा देण्याची जबाबदारी युवकांवर असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले. प्रश्नोत्तरांच्या सत्रात करंजीकर यांनी विद्यार्थ्यांच्या शंका समाधानकारक पद्धतीने दूर केल्या. यामुळे कार्यक्रम अधिक संवादात्मक आणि प्रभावी ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरळीत पार पडले असून, आयोजकांनी केलेल्या उत्तम नियोजनाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. उपस्थितांनी या व्याख्यानातून प्रेरणा घेतल्याचे सांगत अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. एकूणच, “समृद्ध भारत आणि मी” या विषयावरील हे व्याख्यान नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणारे आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणा देणारे ठरले.

देश

“आरटीई कायद्यात सुधारणा करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी”

पुणे  : राईट टू एज्युकेशन ॲक्ट, 2009 मध्ये आवश्यक सुधारणा करून शिक्षण व्यवस्था अधिक समावेशक, न्याय्य आणि प्रभावी करण्यासाठी नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.  यामध्ये प्रामुख्याने अनुदान, अंतर बदल, अल्पसंख्याक संस्थांना दिलेली सूट यांचा समावेश असल्याची माहिती  नागरिक सोशल फाउंडेशनचे सीए सर्वेश मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी संस्थेचे संचालक प्रीतम थोरवे, अमेय सप्रे उपस्थित होते.  पुढे बोलतान सीए सर्वेश मेहेंदळे म्हणाले, भारतीय संविधानातील कलम 21A नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण देणे ही राज्याची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत, शिक्षण हा मूलभूत हक्क सर्वांना समानतेने मिळावा, अशी भूमिका संस्थेची आहे.  शिक्षण हा मूलभूत हक्क असल्यामुळे आरटीई  कायदा कोणत्याही अपवादाशिवाय सर्व शैक्षणिक संस्थांवर, अल्पसंख्याक संस्थांसह, समानपणे लागू करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळांना सध्या दिलेली सूट (Section 1(5)) रद्द करून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत एकसमान आणि न्याय्य धोरण लागू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. आरटीई अंतर्गत शाळांना दिले जाणारे अनुदान वेळेत न मिळाल्यास, थकीत रकमेवर व्याजासह पेमेंट करण्याची स्पष्ट कायदेशीर तरतूद करण्याची मागणी करण्यात आली. सध्याचा 1 किमी/3 किमी अंतर निकष शहरांच्या वाढत्या लोकसंख्येनुसार अपुरा ठरत असल्याने, A+, A, B, C, D ग्रेडिंग प्रणालीवर आधारित नवीन निकष तयार करून ग्रामीण व शहरी भागांसाठी स्वतंत्र नियम निश्चित करावेत, असे सुचविण्यात आले.  समाजातील सर्व घटकांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

देश

“अखिल पुणे शहर रामनवमी उत्सव समिती व समर्थ युवा फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न”

पुणे : अखिल पुणे शहर रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नूमवि वाद्यपथकाच्या सहकार्याने उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झालेआयोजित करण्यात आलेले एकदिवसीय वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. रामनवमीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी, डोळ्यांची तपासणी (मोतीबिंदू/काचबिंदू), दातांची तपासणी, रक्तातील विविध घटकांची तपासणी, कोलेस्टेरॉल तपासणी, रक्तदाब तसेच रक्तातील साखरेची तपासणी अशा विविध सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. सुमारे १३,५०० रुपयांच्या तपासण्या नागरिकांना विनामूल्य करण्यात आल्या.पुण्यातील पर्वती, कर्वेनगर, मंडई परिसर तसेच पद्मावती येथे आयोजित या शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. विविध ठिकाणी रुग्णांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शनही तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले.आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सर्वसामान्यांना सुलभ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. आयोजकांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित कार्यकर्ते, वैद्यकीय पथक आणि स्वयंसेवकांचे विशेष योगदान राहिले.

देश

सुभाषनगर येथे ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न; शि. द. फडणीस यांचा विशेष सत्कार

सुभाषनगर परिसरात आयोजित करण्यात आलेले ‘सकल हिंदू संमेलन’ गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी सायं. ६ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. “विचार एक – घोषणा एक – हिंदू सारा एक” या ब्रीदवाक्याखाली झालेल्या या संमेलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.या संमेलनाचे अध्यक्ष श्री. मोहनराव गुजराथी होते. सूत्र संचालन श्री. दिलीप टिकले यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत कार्यक्रमाचे निवेदन केले. विविध मान्यवरांची ओळख करून देताना त्यांनी संपूर्ण कार्यक्रम रंगतदार केला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री. सुनील देवधर उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून संघाचा शंभर वर्षाचा इतिहास सांगताना, संघाचे संस्थापक प. पू. डॉ . हेडगेवार ह्यांचे चरित्र आणि संघ स्थापने मागील विचार, थोडक्यात सांगितला. स्वयंसेवकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघ कार्य देशाच्या काना कोपऱ्यात पोचवले. कित्येक स्वयंसेवकांनी जीवनाची आहुती दिली त्यामुळे आज संघ जगातील सर्वात मोठी संघटना झाला आहे. हिंदू समाजाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. संमेलनात संतांचे आशीर्वचन देण्यासाठी श्री. भरतकुमार महाराज यांची उपस्थिती लाभली. त्यांनी अध्यात्मिक विचार मांडत समाजात एकात्मता आणि सद्भावनेचा संदेश दिला.यावेळी मराठीतील ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रेय फडणीस (शि. द. फडणीस) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीतून गेली पाच दशके वाचकांना खळखळून हसवणाऱ्या फडणीस यांनी व्यंगचित्रांविषयीचा पारंपरिक समज बदलून टाकला. व्यंगचित्रे म्हणजे केवळ बोचरी टीका किंवा वेडीवाकडी रेखाटने नसून, त्यातूनही सौंदर्य, विनोद आणि सूक्ष्म संदेश व्यक्त होऊ शकतो, हे त्यांनी आपल्या कलेतून दाखवून दिले. विशेष म्हणजे वयाच्या शंभरीतही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा असल्याचे उपस्थितांनी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमात विविध मान्यवरांनीही आपले विचार मांडले. श्री.सौरभ कर्डे यांनी शिवव्याख्यानातून इतिहासाची उजळणी केली, तर प्रा. सुधीर गाडे यांनी सामाजिक समरसतेवर मार्गदर्शन केले. तसेच सौ. डिंपल शाह यांनी कुटुंब प्रबोधनावर विचार मांडले.यावेळी कलावर्धिनी डान्स कंपनीच्या सौ. अरुंधती पटवर्धन व त्यांच्या शिष्या ह्यांनी सादर केलेला संघ गीतांवर आधारित भरतनाट्यम नृत्याविष्कार विशेष आकर्षण ठरला. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट मिळाला.या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सुभाषनगर परिसर सकल हिंदू संमेलन समिती तसेच परिसरातील सर्व प्रमुख सामाजिक व धार्मिक मंडळांचा सहभाग होता. सर्व मंडळांनी एकत्र येऊन केलेला हा पहिलाच कार्यक्रम होता. कार्यक्रमाने एकात्मतेचा आणि सांस्कृतिक जाणीवेचा प्रभावी संदेश दिला

देश

‘शिवराज दिना’निमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रसंगाची आठवण म्हणून ‘शिवराज दिन’ पुण्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हिंदू महिला सभेच्या वतीने हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम लाल महाल, पुणे येथे बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत पार पडणार आहे. शिवकालीन इतिहासातील शौर्य, धैर्य आणि बुद्धिमत्तेचा संगम असलेल्या शाहिस्तेखानाच्या बोटे कापण्याच्या प्रसंगाच्या स्मरणार्थ हा दिवस ‘शिवराज दिन’ म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमामध्ये ‘कथा शिवरायांची’ या विषयावर आधारित देखणा सांस्कृतिक सादरीकरण करण्यात येणार असून, शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंगांद्वारे उपस्थितांना इतिहासाची उजळणी घडवली जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नव्या पिढीपर्यंत शिवाजी महाराजांचे पराक्रम, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याची भावना पोहोचवणे हा आहे.आयोजकांच्या वतीने सर्व नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवकार्याची प्रेरणा घेऊन हिंदुराष्ट्र अधिक समर्थ बनवण्याचा संदेश यावेळी देण्यात येणार आहे.

देश

धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तींना अनुसूचित जाती (SC) दर्जा लागू राहणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे धर्मांतर आणि आरक्षणाच्या हक्कांबाबत पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, एखादी व्यक्ती हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म सोडून अन्य धर्म स्वीकारते, तर ती अनुसूचित जातीच्या वर्गात राहू शकत नाही. न्यायालयाने नमूद केले की, “धर्मांतर झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप संपुष्टात येतो.”दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयात विशेषतः नमूद करण्यात आले की, ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या दलित व्यक्तीस अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (SC/ST Act) संरक्षण मिळणार नाही. या भूमिकेमुळे कायदेशीर आणि सामाजिक स्तरावर महत्त्वाचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ हा ऐतिहासिक सामाजिक अन्याय आणि भेदभाव लक्षात घेऊन दिला गेला आहे. न्यायालयाच्या मते, हा दर्जा विशिष्ट सामाजिक-धार्मिक परिस्थितींशी संबंधित असल्याने धर्मांतरानंतर त्या परिस्थितीत बदल होतो, असे मानले जाते. या निर्णयामुळे धर्मस्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यामधील समतोलाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, धर्मांतरानंतरही सामाजिक भेदभाव पूर्णपणे नाहीसा होत नाही, त्यामुळे अशा व्यक्तींना संरक्षण मिळावे, अशी मागणीही वेळोवेळी करण्यात येत आहे.दरम्यान, या निर्णयामुळे विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून भिन्न प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. काहीजण या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर काहीजण यावर पुनर्विचार करण्याची मागणी करू शकतात.कायद्याच्या आणि समाजव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, पुढील काळात यावर अधिक सविस्तर चर्चा आणि कायदेशीर प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

देश

‘शनिवार पेठेत ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न; हिंदू बांधवांचा मोठा प्रतिसाद’

पुणे: “जातिपातीच्या भिंती विसरून समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे,” असा सूर काल शनिवार पेठ येथे आयोजित ‘सकल हिंदू संमेलनात’ उमटला. मोतीबाग वस्तीतील हिंदू बांधवांच्या सक्रिय सहभागातून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा शनिवारी, २१ मार्च रोजी अहिल्यादेवी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.​कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. प्रीतम जोशी सर यांनी भूषवले.यावेळी वस्तीचे संयोजक श्री . हेमंत मांडके यांचे नेटके नियोजन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. सांस्कृतिक सादरीकरण:संमेलनाची सुरुवात कलानंद नृत्य संस्थेच्या (ठाणे) वतीने सादर करण्यात आलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गणेशवंदनेने झाली.कलानंद संस्थेच्या सौ. पल्लवी लेले निपुणगे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला .त्यानंतर मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘चरैवेति चरैवेति’ ही प्रेरणादायी प्रस्तुती दिली.हे नृत्य शर्मिला कुलकर्णी , योगिता शिंदे , श्वेतांबरी बोध ह्या शिक्षिकांनी बसवले होते ; मुख्याध्यापक प्रसाद लागू सर ह्यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमातील प्रमुख टप्पे:​प्रबोधन: सौ. अपर्णा लेले यांनी ‘पंचपरिवर्तन’ विषयावर मांडलेले विचार आणि ह.भ.प. तेजश्री बाभूळगावकर यांनी दिलेले ‘आशीर्वचन’ यामुळे उपस्थित श्रोत्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. ​इतिहास आणि गौरव: संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर आधारित ‘यशोगाथा’ श्री. जगदीश कश्यप यांनी मांडली.​​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कांचन मांडके यांनी अतिशय ओघवत्या शैलीत केले.विक्रम सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेल्या ‘सांघिक गीताने’ वातावरणात चैतन्य भरले.​शेवटी सौ. प्रतीक्षा कुलकर्णी यांनी गायलेल्या ‘संपूर्ण वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली. या संमेलनाला मोतीबाग वस्तीतील नागरिक सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

Scroll to Top