पुण्यात “आधुनिक भारतासमोरील आव्हाने” पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात व विचारमंथनाच्या वातावरणात संपन्न
पुणे — वाणिज्यविद्या व जनसंपर्क विभाग, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, भारतीय विचार साधना, पुणे आणि विश्व संवाद केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला “आधुनिक भारतासमोरील आव्हाने” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ उत्साहात आणि वैचारिक चर्चांच्या वातावरणात पार पडला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात “जिहाद, शहरी नक्षलवाद, डीप स्टेट, प्रचारवादी चर्चा” यांसारख्या संवेदनशील आणि समकालीन विषयांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आजच्या बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत या विषयांचे वाढते महत्त्व लक्षात घेता, या पुस्तकातून विविध अंगांनी विचारमंथन करण्यात आले आहे.या पुस्तकाचे लेखन डॉ. पंकज जयस्वाल, हर्षाली भुसारी, सागर शिंदे आणि योगेश घोळे या विषयातील अभ्यासक व तज्ञांनी केले असून, त्यांनी आपल्या लेखनातून आधुनिक भारतासमोरील आव्हानांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून ‘साप्ताहिक ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या वर्तमान परिस्थितीचा आढावा घेत, माहिती युद्ध (Information Warfare), विचारप्रणालीवरील प्रभाव आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावाबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच तरुणांनी या विषयांकडे सजगतेने आणि चिकित्सक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सुरू झालेल्या चर्चेचे स्वागत केले आणि अशा प्रकारच्या वैचारिक उपक्रमांची गरज व्यक्त केली.कार्यक्रमाचे आयोजन आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या AV हॉलमध्ये करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.समारोपाच्या वेळी आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले आणि अशाच प्रकारच्या वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येणार असल्याचे सांगितले.