Sankalp Hindu Times

Author name: Lakshmi Jamadar

देश

तेल बाजारात खळबळ! रशिया-भारत व्यवहार पुन्हा चर्चेत

मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना भारतआणि रशिया यांच्यातील कच्च्या तेलाच्या व्यवहाराकडे पुन्हा लक्ष लागले आहे. जागतिक तेल बाजारात अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही संधी ठरू शकते. जागतिक तेल बाजारात सध्या अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावामुळे अनेक देश आपल्या ऊर्जा सुरक्षेबाबत नव्याने रणनीती आखत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत आणि रशिया यांच्यातील कच्च्या तेलाच्या व्यवहाराकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे.गेल्या काही वर्षांत रशियावर पाश्चिमात्य देशांनी आर्थिक निर्बंध लावल्यानंतर जागतिक बाजारात तेलाच्या पुरवठ्याचे समीकरण बदलले. या काळात भारताने ऊर्जा गरजांचा विचार करून रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करण्याचा पर्याय स्वीकारला. परिणामी भारताला तुलनेने कमी दरात तेल उपलब्ध झाले आणि देशाच्या इंधन पुरवठ्यावर तातडीचा दबाव येऊ दिला गेला नाही.तज्ज्ञांच्या मते, सध्या मध्यपूर्वेत वाढत असलेला तणाव आणि समुद्री मार्गांवरील अनिश्चितता यामुळे जागतिक तेलाच्या किमतीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रशियाकडून होणारा पुरवठा भारतासाठी एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. यामुळे देशाच्या ऊर्जा गरजांसाठी विविध स्रोत उपलब्ध राहतात.दरम्यान, ऊर्जा क्षेत्रातील विश्लेषकांचे मत आहे की भारत दीर्घकालीन दृष्टीने एकाच देशावर अवलंबून राहण्याऐवजी विविध देशांशी तेल व्यवहार वाढवण्याच्या धोरणावर भर देत आहे. त्यामुळे रशियाबरोबरचे व्यवहार हे भारताच्या व्यापक ऊर्जा धोरणाचा एक भाग म्हणून पाहिले जात आहेत.जागतिक परिस्थिती सतत बदलत असताना भारत सरकार ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आगामी काळात जागतिक तेल बाजारात होणाऱ्या बदलांनुसार भारताचे आयात धोरणही त्यानुसार समायोजित केले जाईल, असे संकेत तज्ज्ञांकडून दिले जात आहेत.

धर्म, महाराष्ट्र, राजकारण

जबरदस्तीच्या धर्मांतरावर लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचे पाऊल; विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्यात जबरदस्ती, फसवणूक किंवा आमिष दाखवून करण्यात येणाऱ्या धर्मांतराच्या घटनांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावित “महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६” या धर्मांतरविरोधी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली.सरकारच्या मते, या विधेयकाचा उद्देश जबरदस्तीने किंवा फसवणुकीच्या माध्यमातून घडवून आणल्या जाणाऱ्या धर्मांतरांवर नियंत्रण ठेवणे हा आहे. तसेच आर्थिक आमिष किंवा अन्य दबाव टाकून होणाऱ्या धर्मबदलाच्या घटनांनाही आळा घालण्याचा प्रयत्न या कायद्याद्वारे केला जाणार आहे. काही राजकीय नेत्यांनी या प्रस्तावित कायद्याला “लव्ह जिहादविरोधी कायदा” असे संबोधले आहे.मसुद्यातील तरतुदीनुसार, जबरदस्तीने किंवा फसवणूक करून धर्मांतर घडवून आणल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची तरतूद असू शकते. अशा प्रकरणांमध्ये कारावासाची शिक्षा तसेच दंडाची तरतूद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय, धर्मांतर करण्यापूर्वी संबंधित प्रशासनाला पूर्वसूचना देण्याची अटही लागू केली जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.हे विधेयक लवकरच राज्याच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडले जाणार आहे. दोन्ही सभागृहांत मंजुरी मिळाल्यानंतर ते पुढील प्रक्रियेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतरच हा कायदा राज्यात लागू होईल.दरम्यान, या विधेयकाबाबत राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून काही पक्षांनी याला पाठिंबा दर्शवला आहे, तर काहींनी या प्रस्तावावर आक्षेप नोंदवले आहेत.

देश

संजय राऊत सावधान…!

आता राज्यसभेत आंबेडकरी विचारांची लेक शिवसेनेची रणरागिणी येत आहे…! राजकारणात कधी कधी एखादं नाव केवळ व्यक्ती नसतं, तर तो एक स्पष्ट राजकीय संदेश असतो. शिवसेनेकडून प्रा. ज्योती वाघमारे यांची राज्यसभेसाठी झालेली निवडही तशीच मानली जात आहे. आक्रमक वक्तृत्व, अभ्यासू भूमिका आणि आंबेडकरी विचारांची ठाम मांडणी करणारा एक आवाज आता थेट संसदेत पोहोचणार आहे.सोलापूरच्या साध्या कुटुंबात जन्मलेल्या ज्योती वाघमारे यांचा प्रवास हा संघर्षातून घडलेला आहे. झोपडीतील आयुष्य, कष्ट करणारे आई-वडील आणि चिमणीच्या प्रकाशात केलेला अभ्यास — या सगळ्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षणाची वाट निवडली. त्यांच्या जिद्दीचा परिणाम असा की बारावीच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येत त्यांनी स्वतःची क्षमता सिद्ध केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मनात बाळगून त्यांनी आपली बौद्धिक आणि सामाजिक वाटचाल सुरू ठेवली. प्राध्यापक म्हणून काम करत असतानाच आंबेडकरी चळवळीशी त्यांचा मजबूत संबंध कायम राहिला.एप्रिल २०२३ मध्ये शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या अभ्यासू वृत्ती, धारदार मांडणी आणि प्रभावी वक्तृत्वामुळे त्या लवकरच पक्षाच्या राज्य प्रवक्त्या म्हणून पुढे आल्या. मराठी, हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये संवाद साधत त्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडत राहिल्या.विशेष म्हणजे विरोधकांच्या टीकेला तर्कशुद्ध आणि आक्रमक शैलीत उत्तर देणाऱ्या चेहऱ्यांमध्ये त्यांचे नाव पुढे येऊ लागले. अनेकदा माध्यमांमध्ये विरोधी गटातील नेत्यांना, विशेषतः संजय राऊत यांना त्यांनी दिलेली प्रत्युत्तरे चर्चेचा विषय ठरली. त्यामुळेच शिवसेनेकडून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय हा केवळ राजकीय प्रतिनिधित्व नाही, तर एक स्पष्ट संदेश मानला जात आहे. आता संसदेतूनही आंबेडकरी विचारांची ठाम आणि अभ्यासपूर्ण मांडणी ऐकायला मिळणार आहे.झोपडीपासून संसद भवनापर्यंतचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही; तो संघर्ष, शिक्षण आणि विचारांच्या शक्तीचा पुरावा आहे.सोलापूरच्या या लेकीने आज राज्यसभेपर्यंत मजल मारली आहे.आणि म्हणूनच आता एक गोष्ट स्पष्ट आहे. राजकारणात आवाज मोठा असणे महत्त्वाचे नाही पण त्यामागे विचार, अभ्यास आणि संघर्ष असेल तर तो आवाज संसदेतही दुमदुमतो.सोलापूरच्या रणरागिणीला सलाम!

Scroll to Top