Sankalp Hindu Times

Author name: Muktika Watkhedkar

देश

संयुक्त राष्ट्र महिला आयोगाच्या ७० व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्त्री शक्तीचे उपक्रम

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारताचे वाणिज्य दूतावास, न्यूयॉर्क तसेच भारतीय स्त्री शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद, प्रेरणा आणि महिला सक्षमीकरणासाठी समर्पित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच सर्वसमावेशक प्रगतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी कार्यालय, न्यूयॉर्क आणि भारतीय स्त्री शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसेवी संस्थांचा विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “समान संधींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता – सर्वांसाठी समान संधी निर्माण करणे” या विषयावर आधारित हा संवाद कार्यक्रम संयुक्त राष्ट्र महिला आयोगाच्या ७० व्या अधिवेशनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येत आहे. जागतिक स्तरावर महिलांचे सक्षमीकरण, समानता आणि न्यायप्रवेश याविषयी चर्चा घडवून आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र महिला आयोगाचे अधिवेशन महत्त्वपूर्ण मानले जाते. या पार्श्वभूमीवर भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या विविध उपक्रमांमुळे महिलांच्या प्रश्नांकडे जागतिक स्तरावर लक्ष वेधले जात आहे. भारतीय स्त्री शक्तीला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले आहे. या मान्यतेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची संधी भारतीय स्त्री शक्तीला प्राप्त झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी ठरविलेल्या सतत विकास उद्दिष्ट क्रमांक ५ अंतर्गत स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यावर भर दिला जातो. या उद्दिष्टाची पूर्तता करताना महिलांसोबत पुरुषांचाही सक्रिय सहभाग आवश्यक असल्याची जाणीव जगभरात वाढत आहे. या विचाराला पुढे नेत भारतीय स्त्री शक्तीने महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रवासात पुरुषांचाही सहभाग असावा यासाठी सातत्याने आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात “बदलती पुरुषत्वाची संकल्पना” या विषयावर एक लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून समाजात बदलत्या मूल्यांबरोबर पुरुषांची भूमिका कशी असावी, तसेच स्त्री-पुरुष समानतेसाठी पुरुषांचा सकारात्मक सहभाग का आवश्यक आहे, याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या विषयावर पुढे एक विशेष परिसंवाद आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये विविध मान्यवर सहभागी होणार आहेत. या परिसंवादात महिला व बालकल्याण मंत्री सावित्री ठाकूर यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्या उपस्थितीत स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने समाजाने कोणती पावले उचलली पाहिजेत यावर विचारमंथन होणार आहे. याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या सत्रामध्ये “समान संधींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर चर्चा होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केवळ पुरुषच नव्हे तर महिलांनाही समान संधी मिळावी, तसेच त्या क्षेत्रात महिलांनी पुढे येऊन नेतृत्व करावे, या दृष्टीने हा संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय स्त्री शक्तीच्या या उपक्रमांमुळे महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच समाजात स्त्री-पुरुष समानतेची जाणीव अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देश

सकल हिंदू संमेलन, ज्ञानप्रबोधिनी वस्ती तर्फे प्रेरणादायी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

सकल हिंदू परिषद, ज्ञानप्रबोधिनी वस्ती यांच्या वतीने एक प्रेरणादायी व ज्ञानप्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ह.भ.प. परेशबुवा देवळणकर यांनी धर्माची व्याख्या अत्यंत सुंदर व प्रभावी पद्धतीने मांडत धर्माचे समाजजीवनातील महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर इतिहासतज्ज्ञ श्री. अभयजी माटे यांनी संघाच्या शंभर वर्षांच्या कार्याचा आढावा घेत संघाची महत्ता तसेच डॉ. हेडगेवार यांच्या बालपणापासूनच हिंदू समाजाप्रती असलेल्या कार्याची प्रेरणादायी माहिती उपस्थितांना दिली.तसेच सौ. विनयाताई मेहेंदळे यांनी “पंच परिवर्तन” या विषयावर अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुंदर व ओघवते निवेदन गौतमीताई जोशी यांनी केले.कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी सौ. वल्लरी करंदीकर यांनी गायन सेवा सादर केली. त्यांच्या सुमधुर गायनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानप्रबोधिनी वस्तीच्या वतीने अतिशय सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती ज्ञानप्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष प्रणव गोडबोले यांनी हिंदू टाइम्सला दिली.

देश

भारत पुन्हा टी-20 चॅम्पियन! न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय

ICC Men’s T20 World Cup 2026 Final मध्ये भारताने शानदार कामगिरी करत न्यूझीलंडचा तब्बल 96 धावांनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर नाव कोरले.भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 255 धावा करत प्रचंड मोठा स्कोअर उभा केला. या डावात Sanju Samson याने तुफानी फलंदाजी करत 89 धावा केल्या आणि भारताच्या डावाला मजबूत आधार दिला. त्याला Abhishek Sharma (52) आणि Ishan Kishan (54) यांनीही दमदार साथ दिली.256 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. संपूर्ण संघ 159 धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. भारत हा असा एकमेव संघ आहे ज्याने आपले गत विजयते पद राखून ठेवले आहे

देश

संयुक्त प्रसाद मित्र मंडळातर्फे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ, पुणे यांच्या वतीने फाल्गुण कृष्ण तृतीया, शके १९४७, शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी “शिवजन्मोत्सव सोहळा” मोठ्या उत्साहात आणि भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध युवा शिवव्याख्याते मा. श्री. सर्वेशजी मेहेंदळे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. “शिवचरित्र – शिवराय म्हणजे संकल्प, समर्पण, बलिदान, शौर्य आणि स्वाभिमानाचा रोमांचकारी इतिहास” या विषयावर त्यांनी प्रभावी भाषण केले. त्यांच्या ओजस्वी शब्दांनी उपस्थित शेकडो शिवभक्त भारावून गेले. कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.यावेळी स्वस्तिक सोशल फाउंडेशन संचलित गोशाळेसाठी निधी देऊन सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. कार्यक्रमास प्रभाग क्रमांक २५ मधील नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर, सौ. स्वप्नाली पंडित तसेच सौ. स्वरदाताई बापट आणि कसबा अध्यक्ष अमितजी कंक उपस्थित होते.तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप कसबे यांनी मंडळाला भेट देऊन मंडळाच्या सामाजिक व सेवाभावी कार्याचे कौतुक केले.वक्ता परिचय राधेय डिंगरे यांनी करून दिला. तसेच मंडळाचे कुणाल आहेर, संदीप उभे, सुनील मोहिते, प्रणित शिंदे व निखिल हजारे यांनी शिवव्याख्याते सर्वेशजी मेहेंदळे यांचा शाल, श्रीफळ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व फळांची टोकरी देऊन सत्कार करण्यात आला.शिवजयंती निमित्त मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मा. नगरसेवक राजेशजी येनपुरे, उद्योजक विनोद शेठ साखला, विशालजी आढाव, रोहितजी महाजन व इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी राधिका डिंगरे, वेदांत सुतार, अंशुल मोहिते, देवेश गायकवाड, श्रेयस डिंगरे व इतर बाल कार्यकर्त्यांनी लाठी-काठी खेळ तसेच पोवाडा सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक उभे यांनी केले तर आभार प्रदर्शन गुरुदत्त डिंगरे यांनी केले.अजित परांजपे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संयुक्त प्रसाद मित्र मंडळ या नारायण पेठ, पुणे व कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देश

संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगाच्या ७० व्या अधिवेशनात भारतीय स्त्रीशक्तीचा सहभाग

जागतिक स्तरावर महिलांचे हक्क, सक्षमीकरण आणि समानता यांसंदर्भात महत्त्वपूर्ण मानले जाणारे संयुक्त राष्ट्र महिला स्थिती आयोगाचे ७० वे अधिवेशन ९ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत संयुक्त राष्ट्र मुख्यालय, न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात येत आहे. या अधिवेशनात जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी, संयुक्त राष्ट्रांच्या विविध संस्था तसेच आर्थिक व सामाजिक परिषदेकडून मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.या आंतरराष्ट्रीय मंचावर भारतातील भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या प्रतिनिधींचा सहभाग ही अभिमानाची बाब मानली जात आहे. भारतीय समाजजीवनात स्त्रीशक्तीची भूमिका, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि स्त्री सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या माध्यमातून जागतिक स्तरावर मांडली जाणार आहे.या अधिवेशनात भारतीय स्त्री शक्तीच्या वतीने नयना सहस्रबुद्धे, डॉ. ज्योती चौथाईवाले, निपा शुक्ला, उज्वला करंबेळकर, विशाखा माशंकर, रश्मी सामंत आणि साजी नारायण या प्रतिनिधींचा सहभाग राहणार आहे. या सर्व प्रतिनिधी विविध चर्चासत्रे, संवाद आणि विचारमंथनाच्या माध्यमातून भारतीय स्त्रीशक्तीचे विचार आणि अनुभव आंतरराष्ट्रीय मंचावर मांडणार आहेत.या अधिवेशनाचा प्रमुख विषय “सर्व महिला व मुलींना न्यायप्रवेश सुनिश्चित करणे आणि बळकट करणे” हा आहे. या अंतर्गत सर्वसमावेशक आणि न्याय्य कायदेव्यवस्था निर्माण करणे, भेदभावपूर्ण कायदे, धोरणे आणि पद्धती दूर करणे तसेच महिलांना न्याय मिळविताना येणाऱ्या संरचनात्मक अडथळ्यांवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. याशिवाय महिलांना न्यायव्यवस्थेत समान संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे अधिकार प्रभावीपणे संरक्षित करणे आणि सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय पातळीवर त्यांचे सशक्तीकरण करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.तसेच या अधिवेशनात पुनरावलोकन विषय म्हणून सार्वजनिक जीवनात महिलांचा पूर्ण आणि प्रभावी सहभाग, निर्णयप्रक्रियेत त्यांची भूमिका अधिक सक्षम करणे तसेच महिलांवरील हिंसाचाराचे निर्मूलन करून स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने विविध देशांच्या अनुभवांचा आढावा घेतला जाणार आहे. महिलांच्या नेतृत्वविकासाला चालना देणे, धोरणनिर्मिती प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवरही या अधिवेशनात चर्चा अपेक्षित आहे.भारतीय स्त्रीशक्तीच्या प्रतिनिधींना या आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी निवड झाल्याबद्दल विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत असून, जागतिक स्तरावर भारताच्या स्त्रीशक्तीचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देश

“मिलन 2026 मधून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर हल्ला; श्रीलंकेजवळ IRIS Dena बुडाली”

अलीकडे श्रीलंकेच्या दक्षिणेस गॅले समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे ४० नॉटिकल मैल अंतरावर इराणची युद्धनौका IRIS Dena बुडाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. ही नौका भारतात आयोजित करण्यात आलेल्या बहुराष्ट्रीय नौदल युद्धअभ्यास MILAN 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी आली होती आणि कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या मायदेशी परत जात असताना तिच्यावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.या दुर्घटनेत जहाजावरील अनेक खलाशांचा मृत्यू झाला असून काहीजण बेपत्ता आहेत. या घटनेमुळे मानवी जीवितहानी झाली असून त्याबद्दल आम्ही तीव्र दुःख व्यक्त करतो. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या खलाशांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो तसेच जखमी व बचावलेल्या कर्मचाऱ्यांच्या लवकरात लवकर सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.ही घटना आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात घडली असली तरी, भारताच्या निमंत्रणावरून आलेल्या मित्रदेशाच्या युद्धनौकेबाबत घडलेली ही घटना आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने गंभीर मानली जाते. अशा प्रकारच्या कारवायांमुळे जागतिक स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी होणे आणि संबंधित घटकांनी संयम राखणे आवश्यक आहे.या दुर्घटनेनंतर बचावकार्य करण्यात श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. मानवी दृष्टिकोनातून त्यांनी दाखवलेली तत्परता आणि सहकार्य प्रशंसनीय आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता, संवाद आणि परस्पर आदर यांचे तत्त्व जपले गेले पाहिजे. समुद्रातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र हे सर्व देशांसाठी सुरक्षित आणि शांततापूर्ण राहणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जागतिक समुदायाने अधिक जबाबदारीने व संयमाने वागणे गरजेचे आहे.आमची भूमिका स्पष्ट आहे , कोणत्याही प्रकारच्या हिंसक कारवाईपेक्षा संवाद आणि शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवणे हेच दीर्घकालीन स्थैर्यासाठी आवश्यक आहे.

महाराष्ट्र, शहर

श्रद्धा आणि अभिव्यक्तीचा संघर्ष: मृणाल जाधव प्रकरणातून समाज काय बोध घेणार?

Badlapur येथे घडलेल्या अलीकडील घटनेने पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक संवेदनशीलता यांमधील सूक्ष्म सीमारेषा अधोरेखित केली आहे. मृणाल जाधव या तरुणीने सोशल मीडियावर प्रभू Shri Rama यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शहरात निर्माण झालेला असंतोष हा केवळ एका व्यक्तीच्या विधानापुरता मर्यादित नसून, डिजिटल माध्यमांच्या बेजबाबदार वापराचा आणि त्यातून उद्भवणाऱ्या सामाजिक प्रतिक्रियेचा परिपाक आहे.आजच्या काळात एखादा व्हिडिओ किंवा पोस्ट काही क्षणांत हजारो लोकांपर्यंत पोहोचतो. विशेषतः धार्मिक विषयांवर बोलताना सामाजिक भान राखणे अत्यावश्यक ठरते. प्रभू श्रीराम हे कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे त्यांच्या संदर्भातील कोणतेही वक्तव्य केवळ वैयक्तिक मत म्हणून मर्यादित राहत नाही, तर सामाजिक शांततेला धक्का देण्याची शक्यता निर्माण करते.या प्रकरणात काही हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला, तर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, भावना कितीही तीव्र असल्या तरी कायदा हातात घेणे योग्य नाही, हेही तितकेच सत्य आहे.घटनेला राजकीय छटा लाभल्याने चर्चा अधिक तीव्र झाली.. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तींवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर समाजाकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा असते. अशा घटनांमुळे राजकीय नैतिकतेबाबतही प्रश्न उपस्थित होतात.या संपूर्ण प्रकरणातून समाजाने दोन महत्त्वाचे बोध घ्यायला हवेत:१) धार्मिक संयमश्रद्धा हा भावनिक विषय आहे. त्यावर भाष्य करताना तारतम्य, अभ्यास आणि संवेदनशीलता आवश्यक आहे.२) कायद्याचा आदरअभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी त्याला जबाबदारीची जोड असली पाहिजे. आणि संताप असला तरी तो कायद्याच्या चौकटीतच व्यक्त झाला पाहिजे.शेवटी, शांतता राखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अफवा, चिथावणीखोर संदेश आणि अतिरेक टाळून संयम बाळगणे हीच खरी लोकशाहीची कसोटी आहे.मृणाल जाधव प्रकरण हे एका व्यक्तीचे प्रकरण नसून, आपल्या डिजिटल संस्कृतीचे आणि सामाजिक परिपक्वतेचे प्रतिबिंब आहे. अभिव्यक्तीच्या नावाखाली श्रद्धा दुखावणे आणि श्रद्धेच्या नावाखाली असंतोष उफाळू देणे — दोन्ही समाजासाठी घातक आहेत

देश

मोतीबाग नगर येथे सकल हिंदू संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

मोतीबाग नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सकल हिंदू संमेलनास समाजबंधूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजसंघटन, एकात्मता आणि सकारात्मक परिवर्तनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.संमेलनात पूज्य भावार्थ देखणे यांचे आशिर्वचन लाभले. त्यांनी समाजाने एकत्र येऊन संस्कार, संघटन व सदाचाराचा मार्ग स्वीकारावा तसेच धर्मनिष्ठ जीवन जगण्याचे आवाहन केले.या वेळी अंजली ताई तागडे यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर सविस्तर विवेचन केले. समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या पाच प्रमुख मुद्द्यांवर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. तसेच इतिहास संशोधक पांडुरंग बालकावडे यांनी ‘संघाचे शंभर वर्षांचे यशोगाथा’ या विषयावर मार्गदर्शन करत शतकभराच्या कार्याचा प्रेरणादायी आढावा मांडला.कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक मंडळ व कार्यकर्त्यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केले.विशेष म्हणजे, सकल हिंदू संमेलन १ ते ३० मार्च दरम्यान पुणे येथे विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोतीबाग नगर येथील संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुणे शहरातील विविध भागांत होणाऱ्या या संमेलनांमध्ये समाजातील सर्व बंधूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.सकल हिंदू धर्म जागृतीसाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम यशस्वी होवो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

देश

मध्यपूर्वेत तणाव तीव्र: इराण–इस्रायल–अमेरिका संघर्ष उफाळला

मध्यपूर्वेत सध्या Iran, Israel आणि United States यांच्यातील तणाव गंभीर स्वरूप धारण करत आहे. अलीकडील लष्करी कारवायांमुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता वाढली असून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील काही सामरिक आणि लष्करी ठिकाणांवर हवाई व क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. या कारवायांचा उद्देश इराणच्या संरक्षण यंत्रणा आणि क्षेपणास्त्र क्षमतेला कमकुवत करणे हा असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त आहे. इराणची तीव्र प्रतिक्रिया इराण सरकारने या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तसेच, इराणने आपली लष्करी कारवाई ‘स्वसंरक्षणासाठी’ असल्याचा दावा केला आहे. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी त्यांनी जागतिक संस्थांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.अमेरिकेची भूमिका अमेरिकेने आपल्या कारवायांना “प्रादेशिक सुरक्षेसाठी आवश्यक” असे म्हटले आहे. अमेरिकन प्रशासनाने आपल्या नागरिकांना मध्यपूर्वेतील काही भागांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकन सैन्य दल उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले आहेत. इस्रायलची सुरक्षा चिंता इस्रायलने आपल्या सीमावर्ती भागात संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी इराणकडून संभाव्य प्रत्युत्तराची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जागतिक प्रतिक्रिया युरोपियन देशांसह अनेक राष्ट्रांनी तातडीने शांततेचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आणि संवादाद्वारे प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे. तज्ञांच्या मते,हा संघर्ष दीर्घकाळ चालल्यास तेल बाजारपेठ, जागतिक अर्थव्यवस्था आणि प्रादेशिक स्थैर्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

धर्म

श्रीकृष्ण नीती आजही समाजासाठी गरजेची आणि दिशादर्शक – मयूर भावे

नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे व्याख्यानमाला संपन्न पुणे  – कृष्ण नीती म्हणजे केवळ भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सांगितलेले विचार नाहीत तर श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवन म्हणजेच कृष्ण नेते आहे. त्यासाठी श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व समजून घेतले पाहिजे. श्रीकृष्णाचे सर्व गुण आपल्यामध्ये येणे शक्य नाही परंतु त्या पैकी एखादा गुण आपण आत्मसात करू शकतो श्रीकृष्ण विचार हे आजही समाजासाठी गरजेचे आणि दिशादर्शक आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत मयूर भावे यांनी व्यक्त केले. नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गरज कृष्ण नीतीची या विषयावरील व्याख्यानमालेत मयूर भावे बोलत होते. संस्थेचे वक्ता विभाग प्रमुख दीपक मेहेंदळे, विश्वस्त अमेय सप्रे, प्रीतम थोरवे आदि यावेळी उपस्थित होते. मयूर भावे म्हणाले, आजच्या काळामध्ये असलेला हिंसेचा अर्थ हा श्रीकृष्णाचा विचार नाही. श्रीकृष्णाचा हिंसेचा विचारवेगळा आहे. समाजाच्या हितासाठी आवश्यक असणारी हिंसा ही हिंसा ठरत नाही तर तो पराक्रम ठरतो हेच आपण महाभारतातून शकतो. आजच्या काळामध्ये अहिंसेचा चुकीचा अर्थ लावला जात आहे परंतु श्रीकृष्णाचे जो पराक्रमाचा विचार आणि शिकवण आहे ती आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.भूतकाळाचे विस्मरण होऊ न देता आणि भविष्याचा वेध मनामध्ये ठेवून वर्तमान काळ आपल्या हातातून निसटू न देणे म्हणजेच श्रीकृष्ण नीती आहे. श्रीकृष्ण नीती ही कृतीपेक्षा उद्देशाला महत्त्व देते. त्यामुळे आपला उद्देश हा कायम चांगला आणि देशाप्रती योग्य ठेवला पाहिजे. श्रीकृष्ण नीती आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अंगीकारून आपण सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून देशासाठी काय करू शकतो याचा विचार प्रत्येक तरुणाने केला पाहिजे. हा विचार जर प्रत्येक तरुणाने आयुष्यामध्ये अंगीकारला तर भारत निश्चितच एक समृद्ध राष्ट्र म्हणून उदयास येऊ शकेल असेही मयूर भावे यांनी यावेळी सांगितले.अमेय सप्रे म्हणाले, व्याख्यानमालेच्या निमित्ताने राष्ट्र प्रथम हा विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या या कार्यामध्ये सहभागी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भक्ती शक्ती उपक्रमाच्या माध्यमातून प्राचीन मंदिरांचा इतिहास समाजासमोर यावा यासाठी आम्ही कार्य करीत आहोत, तसेच बेटिंग अँप वर बंदी घालून आजच्या तरुणांचे भविष्य सुरक्षित करावे यासाठीही संस्थेने पुढाकार घेतला आहे.भारतीय संस्कृती ही श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या विचारधारेवर उभी आहे. श्रीराम हे आदर्शवादी आहेत तर श्रीकृष्ण हे वास्तववादी आणि व्यवहारावादी आहेत. या दोन्हींचा विचार देशासाठी गरजेचा आहे. देश खऱ्या अर्थाने एक बलशाली राष्ट्र म्हणून उदयास यायचे असेल तर या दोन्ही विचारधारा आजच्या तरुणांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. नागरिक सोशल फाउंडेशन अशा प्रकारे प्रयत्न करत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे अशी प्रशंसा मयूर भावे यांनी यावेळी केली.सायली गोडबोले जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर पुष्कर सप्रे यांनी आभार मानले.

Scroll to Top