Sankalp Hindu Times

देश

देश

धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तींना अनुसूचित जाती (SC) दर्जा लागू राहणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे धर्मांतर आणि आरक्षणाच्या हक्कांबाबत पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, एखादी व्यक्ती हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म सोडून अन्य धर्म स्वीकारते, तर ती अनुसूचित जातीच्या वर्गात राहू शकत नाही. न्यायालयाने नमूद केले की, “धर्मांतर झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप संपुष्टात येतो.”दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयात विशेषतः नमूद करण्यात आले की, ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या दलित व्यक्तीस अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (SC/ST Act) संरक्षण मिळणार नाही. या भूमिकेमुळे कायदेशीर आणि सामाजिक स्तरावर महत्त्वाचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ हा ऐतिहासिक सामाजिक अन्याय आणि भेदभाव लक्षात घेऊन दिला गेला आहे. न्यायालयाच्या मते, हा दर्जा विशिष्ट सामाजिक-धार्मिक परिस्थितींशी संबंधित असल्याने धर्मांतरानंतर त्या परिस्थितीत बदल होतो, असे मानले जाते. या निर्णयामुळे धर्मस्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यामधील समतोलाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, धर्मांतरानंतरही सामाजिक भेदभाव पूर्णपणे नाहीसा होत नाही, त्यामुळे अशा व्यक्तींना संरक्षण मिळावे, अशी मागणीही वेळोवेळी करण्यात येत आहे.दरम्यान, या निर्णयामुळे विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून भिन्न प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. काहीजण या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर काहीजण यावर पुनर्विचार करण्याची मागणी करू शकतात.कायद्याच्या आणि समाजव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, पुढील काळात यावर अधिक सविस्तर चर्चा आणि कायदेशीर प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

देश

‘शनिवार पेठेत ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न; हिंदू बांधवांचा मोठा प्रतिसाद’

पुणे: “जातिपातीच्या भिंती विसरून समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे,” असा सूर काल शनिवार पेठ येथे आयोजित ‘सकल हिंदू संमेलनात’ उमटला. मोतीबाग वस्तीतील हिंदू बांधवांच्या सक्रिय सहभागातून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा शनिवारी, २१ मार्च रोजी अहिल्यादेवी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.​कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. प्रीतम जोशी सर यांनी भूषवले.यावेळी वस्तीचे संयोजक श्री . हेमंत मांडके यांचे नेटके नियोजन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. सांस्कृतिक सादरीकरण:संमेलनाची सुरुवात कलानंद नृत्य संस्थेच्या (ठाणे) वतीने सादर करण्यात आलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गणेशवंदनेने झाली.कलानंद संस्थेच्या सौ. पल्लवी लेले निपुणगे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला .त्यानंतर मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘चरैवेति चरैवेति’ ही प्रेरणादायी प्रस्तुती दिली.हे नृत्य शर्मिला कुलकर्णी , योगिता शिंदे , श्वेतांबरी बोध ह्या शिक्षिकांनी बसवले होते ; मुख्याध्यापक प्रसाद लागू सर ह्यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमातील प्रमुख टप्पे:​प्रबोधन: सौ. अपर्णा लेले यांनी ‘पंचपरिवर्तन’ विषयावर मांडलेले विचार आणि ह.भ.प. तेजश्री बाभूळगावकर यांनी दिलेले ‘आशीर्वचन’ यामुळे उपस्थित श्रोत्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. ​इतिहास आणि गौरव: संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर आधारित ‘यशोगाथा’ श्री. जगदीश कश्यप यांनी मांडली.​​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कांचन मांडके यांनी अतिशय ओघवत्या शैलीत केले.विक्रम सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेल्या ‘सांघिक गीताने’ वातावरणात चैतन्य भरले.​शेवटी सौ. प्रतीक्षा कुलकर्णी यांनी गायलेल्या ‘संपूर्ण वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली. या संमेलनाला मोतीबाग वस्तीतील नागरिक सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

देश

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न’

भारतीय विचार साधना (भाविसा), पुणे यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नाना थिटे सभागृहात उत्साहात आणि मोठ्या उपस्थितीत पार पडला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री गिरीश प्रभुणे, लेखक अरुण करमरकर, ‘भाविसा’चे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे, कार्यवाह काशिनाथ देवधर, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकाचे लेखन दिलीप क्षीरसागर, अरुण करमरकर आणि दिलीप करंबळेकर यांनी केले असून, संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचे विशेष महत्त्व अधोरेखित करण्यात आले.प्रमुख वक्ते सुनील आंबेकर यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागील विचार स्पष्ट करताना सांगितले की, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी समाजातील दोष दूर करून दीर्घकालीन परिवर्तन घडवण्यासाठी संघाची स्थापना केली. त्यांनी व्यक्ती निर्माण आणि त्या व्यक्तींचे संघटन या दोन घटकांवर विशेष भर दिला. समाजपरिवर्तन ही एक नैसर्गिक आणि सतत चालणारी प्रक्रिया असून, ती सर्वसामान्यांच्या सहभागातून घडते, असेही त्यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले की, संघ समजून घेण्यासाठी मोठ्या वैचारिक मांडणीपेक्षा स्वयंसेवकांचे दैनंदिन आचरण अधिक महत्त्वाचे आहे. संघाचे कार्य हे केवळ विचार मांडण्यापुरते मर्यादित नसून ते कृतीतून प्रकट होते, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी आपल्या मनोगतात भारतातील विस्कळीत झालेल्या समाजव्यवस्थेला एकत्र आणण्याचे कार्य संघाने केले असल्याचे सांगितले. विविध क्षेत्रांतील वैचारिक गोंधळ कमी करण्यासाठी संघाचे योगदान महत्त्वाचे ठरले असून, हिंदुत्व हा सर्वांना जोडणारा विचार असल्याची जाणीव आज समाजाला होत असल्याचे त्यांनी नमूद केले. संघ हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून व्यापक सामाजिक एकात्मतेचा विचार मांडणारा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.लेखक अरुण करमरकर यांनी ‘स्वयंसेवक’ या संकल्पनेवर भाष्य करताना सांगितले की, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या तीन शब्दांची मीमांसा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘स्वयंसेवक’ या शब्दाचा अर्थ आणि त्यामागील मूल्ये समजून घेण्याचा आपला अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. गिरीश आफळे यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला, तर काशिनाथ देवधर यांनी आभार प्रदर्शन केले.या प्रसंगी सुनील आंबेकर यांनी ‘धर्म’ आणि ‘रिलिजन’ या संकल्पनांमधील फरक अधोरेखित करताना सांगितले की, भारतीय परंपरेत ‘धर्म’ ही संकल्पना कर्तव्य, मूल्ये आणि समाजकल्याणाशी संबंधित आहे. पाश्चात्त्य ‘रिलिजन’ संकल्पनेशी तुलना केल्यामुळे या विचाराचा गैरसमज झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यकारभार, शिक्षण आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये मूल्याधिष्ठित दृष्टिकोनाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

देश

रा.स्व.संघाची – संघ शताब्दीच्या माध्यमातून यशोगाथा मांडत मध्यपुण्यात भव्य शोभायात्रा

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त संघाची यशोगाथा सांगणारा संघ शताब्दी रथ…जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष रथ…क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मराठी शाळा याविषयी माहिती देणारा समरसता रथछत्रपती शिवाजी महाराज रथसो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे यांचा रथअशा एकापाठोपाठ एक आलेल्या चित्ररथांचा सहभाग गुढीपाडव्याच्या मंगलमय सकाळी पुण्यात अनुभवायला मिळाला. याचसोबत पारंपारिक नगारा, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, मल्लखांब, वेत्रचर्म पथक, लहान मुलींचे साहसी आणि धाडसी खेळ इ. या भव्य शोभायात्रेत सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्ताने यंदाच्या वर्षी संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री. पंत फडके आणि श्री. भाऊराव क्षीरसागर यांच्याहस्ते गुढी उभारण्यात आली. त्यांच्यासोबत कसबा भागाचे मा. संघचालक श्री. प्रशांतजी यादव, मोतीबाग नगराचे मा. संघचालक श्री. शरदराव चंद्रचूड, मोतीबाग नगराचे कार्यवाह मा. श्री. प्रमोद वसगडेकर, श्री. अश्विन देवळणकर, श्री प्रदीप कदम इ. मान्यवर उपस्थित होते.या भव्यदिव्य शोभायात्रेत मा.खा. सौ. मेधाताई कुलकर्णी, मा.आ. श्री. हेमंत रासने, नगरसेवक श्री. राघवेंद्र(बाप्पू) मानकर, श्री. कुणाल टिळक, नगरसेविका सौ. स्वप्नाली नितीन पंडित, सौ. स्वरदा गौरव बापट, निवेदिताताई एकबोटे इ. मान्यवर उपस्थित होते.त्याचसोबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संजीव जावळे, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष श्री. विकास पवार, कोषाध्यक्ष श्री. नितीन पंडित, गजानन मित्र मंडळाचे श्री. सागर दहिभाते, जोगेश्वरी मंदिराचे श्री. बेंद्रे, जिलब्या मारुती मंडळाचे श्री. राजाभाऊ धावडे, सो. क्ष. कासार कालिका माता देवस्थान समितीचे श्री. भांडेकर, नवनीत मित्र मंडळाचे श्री. संतोष फडतरे, अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव समितीचे श्री. निलेश खडके, श्री. अमर भालेराव, इ. चा उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी हिंदू नववर्ष स्वागत समितीचे संयोजक श्री. राघवेंद्र मानकर व सहसंयोजक चैतन्य कुसुरकर, यात्रा प्रमुख गौरव पावटेकर, अथर्व दातार यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. एकत्र होऊनिया सारे… गुढी उभारु हिंदुत्वाची असे म्हणत पारंपरिक वेशात सहभागी पुणेकरांनी शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील गणेश मंडळांचाही तितकाच उस्फुर्तताने सहभाग दिसून आला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट, मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती मंडळ, नवनीत मित्र मंडळ, अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव समिती, कालिका माता देवस्थान समिती, अखिल शनिवार पेठ रामनवमी उत्सव समिती, श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, ट्रस्ट यांनी देखील सहभाग घेतला. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरु झालेली शोभायात्रा तुळशीबाग राममंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर पर्यंत काढण्यात आली. यावेळी गुढी देखील उभारण्यात आली.

देश

नवीन रेल्वे स्टेशनला ‘धर्मवीर आनंद दिघे’ यांचे नाव देण्याची मागणी

ठाणे–मुलुंडदरम्यान प्रस्तावित नव्या रेल्वे स्टेशनला दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली आहे.ठाणे आणि मुलुंड या दरम्यान उभारण्यात येणारे हे नवीन रेल्वे स्टेशन लवकरच मार्गी लागणार असून, या स्टेशनला ‘धर्मवीर आनंद दिघे’ यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, असे मत त्यांनी मांडले.खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत मांडलेल्या या मागणीमुळे ठाणे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.दरम्यान, ठाणे–मुलुंडदरम्यानचे हे नवीन स्टेशन रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे. आनंद दिघे हे ठाणे जिल्ह्यातील अत्यंत प्रभावशाली आणि जनमानसात रुजलेले नेते होते.शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात.त्यांनी ठाण्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिलेसर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी पुढे असायचे,त्यांच्या कामाची शैली अत्यंत थेट, स्पष्ट आणि जनतेशी जोडलेली होती.“धर्मवीर” ही पदवी त्यांना त्यांच्या कार्यामुळेच मिळाली,ठाण्यातील अनेकांसाठी ते केवळ राजकारणी नव्हते,तर आधारवड आणि न्यायासाठी लढणारा नेता होते. ठाणे–मुलुंडदरम्यानचे हे नवीन रेल्वे स्टेशन वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता महत्त्वाचे ठरणार स्थानिकांना प्रवासात दिलासा देणार रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करणार,या मागणीमुळे ठाणे परिसरात पुन्हा एकदा आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.आता या प्रस्तावावर शासन आणि रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देश

“गंगा नदी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय; वाराणसीतील घटनेवर संताप”

वाराणसीत बोटवरील इफ्तार कार्यक्रमात गंगेत हाडे टाकल्याचा आरोप; १४ जण अटकेत वाराणसी येथे गंगा नदीवर आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार कार्यक्रमादरम्यान धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप समोर आला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही व्यक्तींनी जेवणानंतर मांसाचे हाडे गंगा नदीत टाकल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रमजान महिन्यानिमित्त गंगा नदीत बोटीत इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान काही सहभागी व्यक्तींनी चिकन बिर्याणीचे सेवन केल्यानंतर त्यातील उरलेले हाडे नदीत फेकल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. गंगा नदीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारच्या कृतींमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली. तसेच, धार्मिक भावना भडकवणे किंवा दुखावणे हे कायद्याने दंडनीय कृत्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित १४ जणांना ताब्यात घेतले. गंगेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारच्या कृत्यांमुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.दरम्यान, प्रशासनाने सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः धार्मिक स्थळांच्या परिसरात स्वच्छता आणि सामाजिक सौहार्द जपण्याचे आवाहन केले आहे.

देश

“धर्मवीर दिनानिमित्त वडू येथे दुचाकी रॅली; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन”

पुणे, दि. १८ मार्च २०२६ :फाल्गुन अमावास्या निमित्त “धर्मवीर दिन” साजरा करण्यात येत असून, Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी वडू येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर सकाळी ९.३० वाजता चिखली येथून वडू (बुद्रुक) येथे जाण्यासाठी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक, तरुण आणि शिवभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी फाल्गुन अमावास्येला “धर्मवीर दिन” पाळला जातो. मंदिरांचे आणि धर्मसंस्कृतीचे रक्षण करताना दिलेल्या त्यांच्या बलिदानाची आठवण यानिमित्ताने जागवली जाते.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये वडू परिसरात सकाळी ११.३० वाजता पूजाविधी तसेच अभिवादन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. धर्म, संस्कृती आणि इतिहासाची जाणीव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होत असून, तरुणांमध्येही या उपक्रमांबाबत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे

देश

पुण्यात ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न

पुणे : मोती गणपती वस्ती, नारायण पेठ येथे आयोजित ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाले. समस्त हिंदू समाजाने एकत्र येऊन संस्कृती, इतिहास आणि परंपरांचा अभिमान जागवण्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. समाजातील एकोपा, जातीय भेदभाव दूर करून एकत्र येण्याची गरज यावर वक्त्यांनी भर दिला. संमेलनात ह.भ.प. जयंत गोसावी यांचे प्रेरणादायी आशीर्वचन झाले. तसेच श्री. दिनेश कंक (संस्कृती जागरण मंडळाचे ट्रस्टी) यांनी ‘संघ शताब्दी यशोगाथा’ या विषयावर मार्गदर्शन केले. सौ. आभा करंदीकर (इंटेरिअर डिझायनर व ज्योतिष विशारद) यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर विचार मांडले. कार्यक्रमात ‘नटरंग अकादमी’कडून सादर करण्यात आलेल्या शास्त्रीय नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली आणि संमेलनाला सांस्कृतिक रंगत प्राप्त झाली. लोकमान्य सभागृह, केसरी वाडा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू संमेलन समिती, मोती गणपती वस्ती यांच्या वतीने करण्यात आले होते.

देश

बेकायदेशीर धर्मांतरविरोधी कायदा आणण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे नागरिक सोशल फाउंडेशनकडून स्वागत

पुणे : राज्यात वाढत्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तातडीने “महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन (Prevention of Fraud & Coercion) Act” पारित करून लागू करावा, अशी मागणी नागरिक सोशल फाउंडेशन (NSF) या सामाजिक संस्थेने केली होती.  या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतीच कॅबिनेट बैठकीत हा कायदा आणण्याची तयारी केली आहे, राज्य सरकारच्या या भूमिकेचे नागरिक सोशल फाउंडेशनकडून स्वागत करण्यात आले.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा आणणयाचे सुतोवाच केल्याने त्यांचे आणि राज्य सरकारचे आभार माणण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघात  पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळो सीए सर्वेश मेहेंदळे, संचालक प्रीतम थोरवे, पुष्कर सप्रे उपस्थित होते नागरिक सोशल फाऊंडेशनने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात  नमूद केले होते की, महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भाग विशेषतः धुळे, नंदुरबार, पुणे आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये बळजबरी, फसवणूक किंवा प्रलोभनाद्वारे धर्मांतराच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. अशा प्रकारचे अवैध धर्मांतर हे व्यक्तीच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे असून सामाजिक सौहार्दालाही गंभीर धोका निर्माण करणारे आहे. संस्थेने स्पष्ट केले आहे की धर्मांतर हे केवळ व्यक्तीच्या श्रद्धा, स्वेच्छा आणि जाणिवेवर आधारित असावे; दबाव, फसवणूक, आर्थिक लाभ किंवा इतर प्रलोभनाद्वारे केलेले धर्मांतर अवैध ठरले पाहिजे. अशा कायद्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याचा आदर राखत सर्व समुदायांचे संरक्षण, धार्मिक समरसता आणि सामाजिक शांतता दृढ होऊ शकते. तसेच परकीय निधी किंवा अनधिकृत धार्मिक बांधकामांचा गैरवापर थांबवता येईल, आणि दोषी संस्था किंवा व्यक्तींवर कठोर कारवाई करता येईल. नागरिक सोशल फाउंडेशनने सार्वजनिक जनजागृती, सामाजिक संशोधन, कायदेविषयक अभ्यास, तसेच कायदा अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारे डेटा, दस्तऐवज आणि समुदाय संवादाच्या प्रक्रियेत राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.  बेकायदेशीर धर्मांतर हा मुद्दा प्रसार माध्यमांनी व्यवस्थित हाताळल्याने हा कायदा होण्याच्या दृष्टीने पाऊल पडले आहे यामुळे नागरिक सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व पत्रकार, वृत्तपत्रे आणि वृत्त वाहिन्यांचे आभार मानले.

देश

संयुक्त राष्ट्र महिला आयोगाच्या ७० व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्त्री शक्तीचे उपक्रम

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारताचे वाणिज्य दूतावास, न्यूयॉर्क तसेच भारतीय स्त्री शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद, प्रेरणा आणि महिला सक्षमीकरणासाठी समर्पित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच सर्वसमावेशक प्रगतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी कार्यालय, न्यूयॉर्क आणि भारतीय स्त्री शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसेवी संस्थांचा विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “समान संधींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता – सर्वांसाठी समान संधी निर्माण करणे” या विषयावर आधारित हा संवाद कार्यक्रम संयुक्त राष्ट्र महिला आयोगाच्या ७० व्या अधिवेशनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येत आहे. जागतिक स्तरावर महिलांचे सक्षमीकरण, समानता आणि न्यायप्रवेश याविषयी चर्चा घडवून आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र महिला आयोगाचे अधिवेशन महत्त्वपूर्ण मानले जाते. या पार्श्वभूमीवर भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या विविध उपक्रमांमुळे महिलांच्या प्रश्नांकडे जागतिक स्तरावर लक्ष वेधले जात आहे. भारतीय स्त्री शक्तीला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले आहे. या मान्यतेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची संधी भारतीय स्त्री शक्तीला प्राप्त झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी ठरविलेल्या सतत विकास उद्दिष्ट क्रमांक ५ अंतर्गत स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यावर भर दिला जातो. या उद्दिष्टाची पूर्तता करताना महिलांसोबत पुरुषांचाही सक्रिय सहभाग आवश्यक असल्याची जाणीव जगभरात वाढत आहे. या विचाराला पुढे नेत भारतीय स्त्री शक्तीने महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रवासात पुरुषांचाही सहभाग असावा यासाठी सातत्याने आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात “बदलती पुरुषत्वाची संकल्पना” या विषयावर एक लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून समाजात बदलत्या मूल्यांबरोबर पुरुषांची भूमिका कशी असावी, तसेच स्त्री-पुरुष समानतेसाठी पुरुषांचा सकारात्मक सहभाग का आवश्यक आहे, याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या विषयावर पुढे एक विशेष परिसंवाद आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये विविध मान्यवर सहभागी होणार आहेत. या परिसंवादात महिला व बालकल्याण मंत्री सावित्री ठाकूर यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्या उपस्थितीत स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने समाजाने कोणती पावले उचलली पाहिजेत यावर विचारमंथन होणार आहे. याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या सत्रामध्ये “समान संधींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर चर्चा होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केवळ पुरुषच नव्हे तर महिलांनाही समान संधी मिळावी, तसेच त्या क्षेत्रात महिलांनी पुढे येऊन नेतृत्व करावे, या दृष्टीने हा संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय स्त्री शक्तीच्या या उपक्रमांमुळे महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच समाजात स्त्री-पुरुष समानतेची जाणीव अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top