Sankalp Hindu Times

देश

देश

बेकायदेशीर धर्मांतरविरोधी कायदा आणण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे नागरिक सोशल फाउंडेशनकडून स्वागत

पुणे : राज्यात वाढत्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तातडीने “महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन (Prevention of Fraud & Coercion) Act” पारित करून लागू करावा, अशी मागणी नागरिक सोशल फाउंडेशन (NSF) या सामाजिक संस्थेने केली होती.  या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतीच कॅबिनेट बैठकीत हा कायदा आणण्याची तयारी केली आहे, राज्य सरकारच्या या भूमिकेचे नागरिक सोशल फाउंडेशनकडून स्वागत करण्यात आले.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा आणणयाचे सुतोवाच केल्याने त्यांचे आणि राज्य सरकारचे आभार माणण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघात  पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळो सीए सर्वेश मेहेंदळे, संचालक प्रीतम थोरवे, पुष्कर सप्रे उपस्थित होते नागरिक सोशल फाऊंडेशनने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात  नमूद केले होते की, महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भाग विशेषतः धुळे, नंदुरबार, पुणे आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये बळजबरी, फसवणूक किंवा प्रलोभनाद्वारे धर्मांतराच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. अशा प्रकारचे अवैध धर्मांतर हे व्यक्तीच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे असून सामाजिक सौहार्दालाही गंभीर धोका निर्माण करणारे आहे. संस्थेने स्पष्ट केले आहे की धर्मांतर हे केवळ व्यक्तीच्या श्रद्धा, स्वेच्छा आणि जाणिवेवर आधारित असावे; दबाव, फसवणूक, आर्थिक लाभ किंवा इतर प्रलोभनाद्वारे केलेले धर्मांतर अवैध ठरले पाहिजे. अशा कायद्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याचा आदर राखत सर्व समुदायांचे संरक्षण, धार्मिक समरसता आणि सामाजिक शांतता दृढ होऊ शकते. तसेच परकीय निधी किंवा अनधिकृत धार्मिक बांधकामांचा गैरवापर थांबवता येईल, आणि दोषी संस्था किंवा व्यक्तींवर कठोर कारवाई करता येईल. नागरिक सोशल फाउंडेशनने सार्वजनिक जनजागृती, सामाजिक संशोधन, कायदेविषयक अभ्यास, तसेच कायदा अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारे डेटा, दस्तऐवज आणि समुदाय संवादाच्या प्रक्रियेत राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.  बेकायदेशीर धर्मांतर हा मुद्दा प्रसार माध्यमांनी व्यवस्थित हाताळल्याने हा कायदा होण्याच्या दृष्टीने पाऊल पडले आहे यामुळे नागरिक सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व पत्रकार, वृत्तपत्रे आणि वृत्त वाहिन्यांचे आभार मानले.

देश

संयुक्त राष्ट्र महिला आयोगाच्या ७० व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्त्री शक्तीचे उपक्रम

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारताचे वाणिज्य दूतावास, न्यूयॉर्क तसेच भारतीय स्त्री शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद, प्रेरणा आणि महिला सक्षमीकरणासाठी समर्पित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच सर्वसमावेशक प्रगतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी कार्यालय, न्यूयॉर्क आणि भारतीय स्त्री शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसेवी संस्थांचा विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “समान संधींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता – सर्वांसाठी समान संधी निर्माण करणे” या विषयावर आधारित हा संवाद कार्यक्रम संयुक्त राष्ट्र महिला आयोगाच्या ७० व्या अधिवेशनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येत आहे. जागतिक स्तरावर महिलांचे सक्षमीकरण, समानता आणि न्यायप्रवेश याविषयी चर्चा घडवून आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र महिला आयोगाचे अधिवेशन महत्त्वपूर्ण मानले जाते. या पार्श्वभूमीवर भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या विविध उपक्रमांमुळे महिलांच्या प्रश्नांकडे जागतिक स्तरावर लक्ष वेधले जात आहे. भारतीय स्त्री शक्तीला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले आहे. या मान्यतेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची संधी भारतीय स्त्री शक्तीला प्राप्त झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी ठरविलेल्या सतत विकास उद्दिष्ट क्रमांक ५ अंतर्गत स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यावर भर दिला जातो. या उद्दिष्टाची पूर्तता करताना महिलांसोबत पुरुषांचाही सक्रिय सहभाग आवश्यक असल्याची जाणीव जगभरात वाढत आहे. या विचाराला पुढे नेत भारतीय स्त्री शक्तीने महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रवासात पुरुषांचाही सहभाग असावा यासाठी सातत्याने आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात “बदलती पुरुषत्वाची संकल्पना” या विषयावर एक लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून समाजात बदलत्या मूल्यांबरोबर पुरुषांची भूमिका कशी असावी, तसेच स्त्री-पुरुष समानतेसाठी पुरुषांचा सकारात्मक सहभाग का आवश्यक आहे, याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या विषयावर पुढे एक विशेष परिसंवाद आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये विविध मान्यवर सहभागी होणार आहेत. या परिसंवादात महिला व बालकल्याण मंत्री सावित्री ठाकूर यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्या उपस्थितीत स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने समाजाने कोणती पावले उचलली पाहिजेत यावर विचारमंथन होणार आहे. याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या सत्रामध्ये “समान संधींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर चर्चा होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केवळ पुरुषच नव्हे तर महिलांनाही समान संधी मिळावी, तसेच त्या क्षेत्रात महिलांनी पुढे येऊन नेतृत्व करावे, या दृष्टीने हा संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय स्त्री शक्तीच्या या उपक्रमांमुळे महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच समाजात स्त्री-पुरुष समानतेची जाणीव अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देश

सकल हिंदू संमेलन, ज्ञानप्रबोधिनी वस्ती तर्फे प्रेरणादायी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

सकल हिंदू परिषद, ज्ञानप्रबोधिनी वस्ती यांच्या वतीने एक प्रेरणादायी व ज्ञानप्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ह.भ.प. परेशबुवा देवळणकर यांनी धर्माची व्याख्या अत्यंत सुंदर व प्रभावी पद्धतीने मांडत धर्माचे समाजजीवनातील महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर इतिहासतज्ज्ञ श्री. अभयजी माटे यांनी संघाच्या शंभर वर्षांच्या कार्याचा आढावा घेत संघाची महत्ता तसेच डॉ. हेडगेवार यांच्या बालपणापासूनच हिंदू समाजाप्रती असलेल्या कार्याची प्रेरणादायी माहिती उपस्थितांना दिली.तसेच सौ. विनयाताई मेहेंदळे यांनी “पंच परिवर्तन” या विषयावर अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुंदर व ओघवते निवेदन गौतमीताई जोशी यांनी केले.कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी सौ. वल्लरी करंदीकर यांनी गायन सेवा सादर केली. त्यांच्या सुमधुर गायनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानप्रबोधिनी वस्तीच्या वतीने अतिशय सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती ज्ञानप्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष प्रणव गोडबोले यांनी हिंदू टाइम्सला दिली.

देश

भारत पुन्हा टी-20 चॅम्पियन! न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय

ICC Men’s T20 World Cup 2026 Final मध्ये भारताने शानदार कामगिरी करत न्यूझीलंडचा तब्बल 96 धावांनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर नाव कोरले.भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 255 धावा करत प्रचंड मोठा स्कोअर उभा केला. या डावात Sanju Samson याने तुफानी फलंदाजी करत 89 धावा केल्या आणि भारताच्या डावाला मजबूत आधार दिला. त्याला Abhishek Sharma (52) आणि Ishan Kishan (54) यांनीही दमदार साथ दिली.256 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. संपूर्ण संघ 159 धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. भारत हा असा एकमेव संघ आहे ज्याने आपले गत विजयते पद राखून ठेवले आहे

देश

संयुक्त प्रसाद मित्र मंडळातर्फे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ, पुणे यांच्या वतीने फाल्गुण कृष्ण तृतीया, शके १९४७, शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी “शिवजन्मोत्सव सोहळा” मोठ्या उत्साहात आणि भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध युवा शिवव्याख्याते मा. श्री. सर्वेशजी मेहेंदळे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. “शिवचरित्र – शिवराय म्हणजे संकल्प, समर्पण, बलिदान, शौर्य आणि स्वाभिमानाचा रोमांचकारी इतिहास” या विषयावर त्यांनी प्रभावी भाषण केले. त्यांच्या ओजस्वी शब्दांनी उपस्थित शेकडो शिवभक्त भारावून गेले. कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.यावेळी स्वस्तिक सोशल फाउंडेशन संचलित गोशाळेसाठी निधी देऊन सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. कार्यक्रमास प्रभाग क्रमांक २५ मधील नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर, सौ. स्वप्नाली पंडित तसेच सौ. स्वरदाताई बापट आणि कसबा अध्यक्ष अमितजी कंक उपस्थित होते.तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप कसबे यांनी मंडळाला भेट देऊन मंडळाच्या सामाजिक व सेवाभावी कार्याचे कौतुक केले.वक्ता परिचय राधेय डिंगरे यांनी करून दिला. तसेच मंडळाचे कुणाल आहेर, संदीप उभे, सुनील मोहिते, प्रणित शिंदे व निखिल हजारे यांनी शिवव्याख्याते सर्वेशजी मेहेंदळे यांचा शाल, श्रीफळ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व फळांची टोकरी देऊन सत्कार करण्यात आला.शिवजयंती निमित्त मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मा. नगरसेवक राजेशजी येनपुरे, उद्योजक विनोद शेठ साखला, विशालजी आढाव, रोहितजी महाजन व इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी राधिका डिंगरे, वेदांत सुतार, अंशुल मोहिते, देवेश गायकवाड, श्रेयस डिंगरे व इतर बाल कार्यकर्त्यांनी लाठी-काठी खेळ तसेच पोवाडा सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक उभे यांनी केले तर आभार प्रदर्शन गुरुदत्त डिंगरे यांनी केले.अजित परांजपे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संयुक्त प्रसाद मित्र मंडळ या नारायण पेठ, पुणे व कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देश

संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगाच्या ७० व्या अधिवेशनात भारतीय स्त्रीशक्तीचा सहभाग

जागतिक स्तरावर महिलांचे हक्क, सक्षमीकरण आणि समानता यांसंदर्भात महत्त्वपूर्ण मानले जाणारे संयुक्त राष्ट्र महिला स्थिती आयोगाचे ७० वे अधिवेशन ९ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत संयुक्त राष्ट्र मुख्यालय, न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात येत आहे. या अधिवेशनात जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी, संयुक्त राष्ट्रांच्या विविध संस्था तसेच आर्थिक व सामाजिक परिषदेकडून मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.या आंतरराष्ट्रीय मंचावर भारतातील भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या प्रतिनिधींचा सहभाग ही अभिमानाची बाब मानली जात आहे. भारतीय समाजजीवनात स्त्रीशक्तीची भूमिका, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि स्त्री सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या माध्यमातून जागतिक स्तरावर मांडली जाणार आहे.या अधिवेशनात भारतीय स्त्री शक्तीच्या वतीने नयना सहस्रबुद्धे, डॉ. ज्योती चौथाईवाले, निपा शुक्ला, उज्वला करंबेळकर, विशाखा माशंकर, रश्मी सामंत आणि साजी नारायण या प्रतिनिधींचा सहभाग राहणार आहे. या सर्व प्रतिनिधी विविध चर्चासत्रे, संवाद आणि विचारमंथनाच्या माध्यमातून भारतीय स्त्रीशक्तीचे विचार आणि अनुभव आंतरराष्ट्रीय मंचावर मांडणार आहेत.या अधिवेशनाचा प्रमुख विषय “सर्व महिला व मुलींना न्यायप्रवेश सुनिश्चित करणे आणि बळकट करणे” हा आहे. या अंतर्गत सर्वसमावेशक आणि न्याय्य कायदेव्यवस्था निर्माण करणे, भेदभावपूर्ण कायदे, धोरणे आणि पद्धती दूर करणे तसेच महिलांना न्याय मिळविताना येणाऱ्या संरचनात्मक अडथळ्यांवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. याशिवाय महिलांना न्यायव्यवस्थेत समान संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे अधिकार प्रभावीपणे संरक्षित करणे आणि सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय पातळीवर त्यांचे सशक्तीकरण करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.तसेच या अधिवेशनात पुनरावलोकन विषय म्हणून सार्वजनिक जीवनात महिलांचा पूर्ण आणि प्रभावी सहभाग, निर्णयप्रक्रियेत त्यांची भूमिका अधिक सक्षम करणे तसेच महिलांवरील हिंसाचाराचे निर्मूलन करून स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने विविध देशांच्या अनुभवांचा आढावा घेतला जाणार आहे. महिलांच्या नेतृत्वविकासाला चालना देणे, धोरणनिर्मिती प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवरही या अधिवेशनात चर्चा अपेक्षित आहे.भारतीय स्त्रीशक्तीच्या प्रतिनिधींना या आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी निवड झाल्याबद्दल विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत असून, जागतिक स्तरावर भारताच्या स्त्रीशक्तीचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देश

तेल बाजारात खळबळ! रशिया-भारत व्यवहार पुन्हा चर्चेत

मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना भारतआणि रशिया यांच्यातील कच्च्या तेलाच्या व्यवहाराकडे पुन्हा लक्ष लागले आहे. जागतिक तेल बाजारात अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही संधी ठरू शकते. जागतिक तेल बाजारात सध्या अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावामुळे अनेक देश आपल्या ऊर्जा सुरक्षेबाबत नव्याने रणनीती आखत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत आणि रशिया यांच्यातील कच्च्या तेलाच्या व्यवहाराकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे.गेल्या काही वर्षांत रशियावर पाश्चिमात्य देशांनी आर्थिक निर्बंध लावल्यानंतर जागतिक बाजारात तेलाच्या पुरवठ्याचे समीकरण बदलले. या काळात भारताने ऊर्जा गरजांचा विचार करून रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करण्याचा पर्याय स्वीकारला. परिणामी भारताला तुलनेने कमी दरात तेल उपलब्ध झाले आणि देशाच्या इंधन पुरवठ्यावर तातडीचा दबाव येऊ दिला गेला नाही.तज्ज्ञांच्या मते, सध्या मध्यपूर्वेत वाढत असलेला तणाव आणि समुद्री मार्गांवरील अनिश्चितता यामुळे जागतिक तेलाच्या किमतीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रशियाकडून होणारा पुरवठा भारतासाठी एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. यामुळे देशाच्या ऊर्जा गरजांसाठी विविध स्रोत उपलब्ध राहतात.दरम्यान, ऊर्जा क्षेत्रातील विश्लेषकांचे मत आहे की भारत दीर्घकालीन दृष्टीने एकाच देशावर अवलंबून राहण्याऐवजी विविध देशांशी तेल व्यवहार वाढवण्याच्या धोरणावर भर देत आहे. त्यामुळे रशियाबरोबरचे व्यवहार हे भारताच्या व्यापक ऊर्जा धोरणाचा एक भाग म्हणून पाहिले जात आहेत.जागतिक परिस्थिती सतत बदलत असताना भारत सरकार ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आगामी काळात जागतिक तेल बाजारात होणाऱ्या बदलांनुसार भारताचे आयात धोरणही त्यानुसार समायोजित केले जाईल, असे संकेत तज्ज्ञांकडून दिले जात आहेत.

देश

संजय राऊत सावधान…!

आता राज्यसभेत आंबेडकरी विचारांची लेक शिवसेनेची रणरागिणी येत आहे…! राजकारणात कधी कधी एखादं नाव केवळ व्यक्ती नसतं, तर तो एक स्पष्ट राजकीय संदेश असतो. शिवसेनेकडून प्रा. ज्योती वाघमारे यांची राज्यसभेसाठी झालेली निवडही तशीच मानली जात आहे. आक्रमक वक्तृत्व, अभ्यासू भूमिका आणि आंबेडकरी विचारांची ठाम मांडणी करणारा एक आवाज आता थेट संसदेत पोहोचणार आहे.सोलापूरच्या साध्या कुटुंबात जन्मलेल्या ज्योती वाघमारे यांचा प्रवास हा संघर्षातून घडलेला आहे. झोपडीतील आयुष्य, कष्ट करणारे आई-वडील आणि चिमणीच्या प्रकाशात केलेला अभ्यास — या सगळ्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षणाची वाट निवडली. त्यांच्या जिद्दीचा परिणाम असा की बारावीच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येत त्यांनी स्वतःची क्षमता सिद्ध केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मनात बाळगून त्यांनी आपली बौद्धिक आणि सामाजिक वाटचाल सुरू ठेवली. प्राध्यापक म्हणून काम करत असतानाच आंबेडकरी चळवळीशी त्यांचा मजबूत संबंध कायम राहिला.एप्रिल २०२३ मध्ये शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या अभ्यासू वृत्ती, धारदार मांडणी आणि प्रभावी वक्तृत्वामुळे त्या लवकरच पक्षाच्या राज्य प्रवक्त्या म्हणून पुढे आल्या. मराठी, हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये संवाद साधत त्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडत राहिल्या.विशेष म्हणजे विरोधकांच्या टीकेला तर्कशुद्ध आणि आक्रमक शैलीत उत्तर देणाऱ्या चेहऱ्यांमध्ये त्यांचे नाव पुढे येऊ लागले. अनेकदा माध्यमांमध्ये विरोधी गटातील नेत्यांना, विशेषतः संजय राऊत यांना त्यांनी दिलेली प्रत्युत्तरे चर्चेचा विषय ठरली. त्यामुळेच शिवसेनेकडून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय हा केवळ राजकीय प्रतिनिधित्व नाही, तर एक स्पष्ट संदेश मानला जात आहे. आता संसदेतूनही आंबेडकरी विचारांची ठाम आणि अभ्यासपूर्ण मांडणी ऐकायला मिळणार आहे.झोपडीपासून संसद भवनापर्यंतचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही; तो संघर्ष, शिक्षण आणि विचारांच्या शक्तीचा पुरावा आहे.सोलापूरच्या या लेकीने आज राज्यसभेपर्यंत मजल मारली आहे.आणि म्हणूनच आता एक गोष्ट स्पष्ट आहे. राजकारणात आवाज मोठा असणे महत्त्वाचे नाही पण त्यामागे विचार, अभ्यास आणि संघर्ष असेल तर तो आवाज संसदेतही दुमदुमतो.सोलापूरच्या रणरागिणीला सलाम!

देश

“मिलन 2026 मधून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर हल्ला; श्रीलंकेजवळ IRIS Dena बुडाली”

अलीकडे श्रीलंकेच्या दक्षिणेस गॅले समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे ४० नॉटिकल मैल अंतरावर इराणची युद्धनौका IRIS Dena बुडाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. ही नौका भारतात आयोजित करण्यात आलेल्या बहुराष्ट्रीय नौदल युद्धअभ्यास MILAN 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी आली होती आणि कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या मायदेशी परत जात असताना तिच्यावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.या दुर्घटनेत जहाजावरील अनेक खलाशांचा मृत्यू झाला असून काहीजण बेपत्ता आहेत. या घटनेमुळे मानवी जीवितहानी झाली असून त्याबद्दल आम्ही तीव्र दुःख व्यक्त करतो. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या खलाशांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो तसेच जखमी व बचावलेल्या कर्मचाऱ्यांच्या लवकरात लवकर सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.ही घटना आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात घडली असली तरी, भारताच्या निमंत्रणावरून आलेल्या मित्रदेशाच्या युद्धनौकेबाबत घडलेली ही घटना आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने गंभीर मानली जाते. अशा प्रकारच्या कारवायांमुळे जागतिक स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी होणे आणि संबंधित घटकांनी संयम राखणे आवश्यक आहे.या दुर्घटनेनंतर बचावकार्य करण्यात श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. मानवी दृष्टिकोनातून त्यांनी दाखवलेली तत्परता आणि सहकार्य प्रशंसनीय आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता, संवाद आणि परस्पर आदर यांचे तत्त्व जपले गेले पाहिजे. समुद्रातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र हे सर्व देशांसाठी सुरक्षित आणि शांततापूर्ण राहणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जागतिक समुदायाने अधिक जबाबदारीने व संयमाने वागणे गरजेचे आहे.आमची भूमिका स्पष्ट आहे , कोणत्याही प्रकारच्या हिंसक कारवाईपेक्षा संवाद आणि शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवणे हेच दीर्घकालीन स्थैर्यासाठी आवश्यक आहे.

देश

मोतीबाग नगर येथे सकल हिंदू संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

मोतीबाग नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सकल हिंदू संमेलनास समाजबंधूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजसंघटन, एकात्मता आणि सकारात्मक परिवर्तनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.संमेलनात पूज्य भावार्थ देखणे यांचे आशिर्वचन लाभले. त्यांनी समाजाने एकत्र येऊन संस्कार, संघटन व सदाचाराचा मार्ग स्वीकारावा तसेच धर्मनिष्ठ जीवन जगण्याचे आवाहन केले.या वेळी अंजली ताई तागडे यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर सविस्तर विवेचन केले. समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या पाच प्रमुख मुद्द्यांवर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. तसेच इतिहास संशोधक पांडुरंग बालकावडे यांनी ‘संघाचे शंभर वर्षांचे यशोगाथा’ या विषयावर मार्गदर्शन करत शतकभराच्या कार्याचा प्रेरणादायी आढावा मांडला.कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक मंडळ व कार्यकर्त्यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केले.विशेष म्हणजे, सकल हिंदू संमेलन १ ते ३० मार्च दरम्यान पुणे येथे विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोतीबाग नगर येथील संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुणे शहरातील विविध भागांत होणाऱ्या या संमेलनांमध्ये समाजातील सर्व बंधूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.सकल हिंदू धर्म जागृतीसाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम यशस्वी होवो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Scroll to Top